अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

मंगळवार, २४ मार्च, २०२६

मालवणातील 'त्या' भोंदू महिलेची 'अंनिस'ने केली भांडाफोड..

महिलेकडून लेखी माफीनामा; उपजीविकेसाठी असे कृत्य करत असल्याची कबुली
मालवण : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सध्या भोंदू खैरातबाबाचे प्रकरण गाजत असतानाच मालवण शहरातील एका भोंदू महिलेच्या वास्तवाचा अंनिसने पर्दाफाश केला. आपल्या अंगात विविध सात देवींची अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत ती महिला लोकांना फसवत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर त्या महिलेने आपण केवळ उपजीविकेसाठी हे काम करत असल्याचा माफीनामा लिहून दिला असल्याचे 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती'चे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी सांगितले.
ही महिला भोळ्या भाविकांना भूत, भविष्य, वर्तमान काळात घडणाऱ्या घटना सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत असे. तिने आपल्या सख्या भावजयीवरही जादूटोणा केल्याचा आरोप केला होता. तिच्या करणीमुळे आपला नवरा सारखा आजारी पडतो, असे सांगत ती भावजयीची बदनामी करून तिला मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून तिच्या भावजयीने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. आपल्या भावजयीपासून होणाऱ्या त्रासापासून आम्हाला न्याय द्यावा व होणारा त्रास कमी करावा, असा अर्ज दिला होता.
---------
मुले व आजारी नवरा पाहून दिली एक संधी
तिची लहान मुले पाहता आईवर केस दाखल झाली तर मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो याचा विचार करून, तसेच तिचा नवरा आजारी असतो त्याचेवर मानसिक आघात होऊ शकतो, यामुळे तिच्याविरोधात कोणतीही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल न करता तिचा समक्ष माफीनामा लिहून घेऊन यापुढे माझ्या अंगात कोणतीही देवी आणणार नाही अथवा बाहेर कोणाच्याही घरी देवी अंगात काढून त्यांचे प्रश्न सोडविणार नाही असे लेखी लिहून घेऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून तिला चांगले वागण्याची समज देण्यात आली. पुढे अशी तक्रार आल्यास मात्र गुन्हा नक्कीच दाखल करू असे सांगितले.
-----
...तर 'अंनिस' ८० लाख रु. बक्षीस देईल!
जर कोणत्याही व्यक्ती अथवा स्त्रीच्या अंगात असा कोणताही दिव्य संचार होत असेल तर आमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ८० लाख रुपये बक्षीस देऊ शकते. अशा व्यक्तीने समितीचे ऐंशी लाखाचे बक्षीसाचे आवाहन स्वीकारावे असे आवाहन विजय चौकेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे. ही भांडाफोड करण्यास अध्यक्ष ॲड. राजीव बिले यांनी मार्गदर्शन केले.
--------
सरचिटणीस अजित कानशिंदे, युवा संघटक युगांत चव्हाण यांच्यासह सदर महिलेकडे गेले. त्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. यामध्ये माझ्या मुलाचे लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी त्याला मूल होत नाही आणि सून नांदायला येत नाही, असे सांगितले. खरेतर चौकेकर यांच्या मुलाचे चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. उज्वला येळावीकर यांनी आपल्या मुलीचे लग्न ठरले होते आणि लग्नासाठी केलेले दागिने चोरीस गेले ते कधी मिळतील? असे विचारले. युगांत चव्हाण आपल्या आई-वडिलांना उलट बोलतो, तर कधी-कधी आई-वडिलांच्या अंगावर धावून जातो, असे सुनेला संबंध बाधा आणि करणी केलेली असल्याने ती काढल्याशिवाय तिला मूल होणार नाही. तिची करणी मी तिला घेऊन आल्यावर काढू शकते, असा दावा केला. श्रीमती येळावीकर यांचे दागिने नवऱ्या मुलानेच चोरले असून, मी माझी शक्ती येथून सोडते, तो पंधरा दिवसांत तुमचे दागिने आणून देईल, असे उत्तर दिले. तर युगांत चव्हाण यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दोन भूताने तुला झपाटले असून, ही भूते आज मी उतरवली असती पण तुम्ही काळे टीशर्ट घातल्याने माझी शक्ती चालणार नाही असे सांगितले.
त्यानंतर युगांत चव्हाण यांच्या अंगावरील भूत उतरवण्यासाठी त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर स्वतःच्या शरीराचा पूर्ण दाब देऊन त्या पायाला इजा होईल असे वर्तन केले. सून म्हणून आलेल्या मुलीच्या केसाला धरून संबंध उतरवण्यासाठी तिला गोल गोल फिरविले. चोराने अद्यापही दागिने आणून दिले नसल्याचे सांगताच मी माझी पुन्हा शक्ती येथून सोडते, तो दागिने पंधरा दिवसांत आणून देईल असा दावा केला. तिसऱ्या वेळी तिच्या घरी व मुलाला घेऊन यावे, असे सांगितले. तिने सांगितल्याप्रमाणे सगळे केल्यानंतर पुन्हा चौकेकर यांनी त्या देवीकडे एक दुसरी मुलगी सून म्हणून घेऊन गेले. युगांत चव्हाण यांच्या अंगावरील भूत उतरवण्यासाठी त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर स्वतःच्या शरीराचा पूर्ण दाब देऊन त्या पायाला इजा होईल असे वर्तन केले. सून म्हणून आलेल्या मुलीच्या केसाला धरून संबंध उतरवण्यासाठी तिला गोल गोल फिरविले.
आपण केलेल्या कृत्यांची कल्पना येताच तिचे यजमान व ती गयावया करू लागली. आपल्याकडून घडलेली कृत्ये कशी चुकीची आहेत त्याची जाणीव झाली. माझ्या अंगात कोणत्याही देवीचा संचार होत नसून मला कोणतीही अलौकिक शक्ती प्राप्त नाही. मी माझ्या पोटापाण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी अंगात विविध प्रकारच्या देवी येत असल्याचे सोंग करत होते; पण आपण मला एकदा संधी दिल्यास मी प्रामाणिकपणे वागेन, असे तिने सांगितले.
🌞

**एक वेळ मला संधी दया . मी पुन्हा अंगात देवी काढण्याचे सोंग करणार नाही .*


                अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केली अंगात येणाऱ्या देवीची पोलखोल .
कुडाळ वार्ताहर-
      कुडाळ तालुक्यातील आवळेगांव पाटकरटेंब येथे रस्त्यालगतच  गेले दहा ते पंधरा वर्ष रत्नप्रभा चंद्रकांत तावडे हि स्त्री  पटकी देवी आणि सात बायांची शक्ती आपल्या अंगात येते असे भासवून कधीही, कोणत्याही वाराला आणि कोणत्याही क्षणी बसल्या बसल्या दुसऱ्या मिनिटाला आपल्या अंगात देवीचा संचार झाल्याचे भासवून पाच हजार ते पन्नास हजार तर कधी कधी एक लाख रुपयापर्यंत पायापासून डोक्यापर्यंत आणि मूळा पासून शेंड्यापर्यंत असलेली नड उतरविण्याचा  दावा करीत होती .तिच्या सोबत या असलेल्या नडीची तोड करण्यासाठी एक व्यक्ती नेमण्यात आला होता . सदरच्या व्यक्तीने काही जणांकडून रोख घेतलेल्या रक्कमांचा कागद तिनेच अभाअंनिसला सादर केला . यामध्ये नंदाकडून पंधरा .हजार, सुनंदाकडून वीस हजार, नाईक , सचिन, साळुंखे प्रत्येकी पाच हजार, काकूबाई पंधरा हजार, साळुंखे सहा हजार, नागेश तीस हजार, कावरे दहा हजार, कपडेवाले तीस हजार, शोभा कडून पन्नास हजार, सर्वेश कडून एक लाख . हा ढोबळ हिशेब सादर केला . प्रत्यक्षात अजून लाखो रुपयांचा कागदाचा हिशेब मिळू शकेल . अशी लाखो रुपयांची बिदागी श्रद्धाळू आणि अज्ञानी लोकांकडून  वसूल केली जात होती.
कोणीही कोणतीही समस्या विचारली तरी सर्वांना पंचाक्षरी जाप आणि करणी भावकेतून, भावबंदातून आणि पावण्यातून केलेली आसा . यासाठी घर आकार, कुळाचार, वाटमारो, पितरगत सवाशिन , खूनी देवता, आकार वस , खूनी निर्वशी, चालू निर्वशी राजी करूसाठी मूळापासून ते शेंड्या पर्यंत बेंदूक होया . यासाठी ज्याची समस्या आहे त्या प्रत्येकाला पंधरा ते सव्वीस नारळ, एक ते पाच कोंबडे, सव्वा किलो साखर,तीन बाऊले , आंब्याची चाळीस पाने, एकवीस ते तीस  वीडे, तेवढेच एक रुपयाच कॉईन, साडी चोळी, सात खण , कुजका नारळ, कातर लिंगडीची आणि काजऱ्याची पाने, बीब्बे, सात प्रकारची फूले, सात प्रकारचे धान्य,  ब्राह्मण शिदा, कुवाळा ,शंभर खावची पाने,  पपई, लिंबे ,अंडी, डुकराचे केस, गव्हाचे पीठ, सुके खोबरे, फरसाण,  सोन्याची नाणी. या साहित्यानंतर ते तोडकाम करण्यासाठी तीन हजार ते पुढे लाख भर रूपयापर्यंत पैसे सांगत होती . अखिल भारतीय निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी पूर्वी तिच्या घरी जाऊन स्वतःची खरी ओळख आणि आवळेगाव येथे शिक्षक म्हणून काम केले असल्याचे खरे सांगून अंदाजे काय काय लागेल आणि किती खर्च येईल याचा अंदाज विचारून घेऊन विश्वास संपादन केला होता .
त्यानंतर नुकतेच त्यांनी आपल्या सोबत जिल्हा अध्यक्ष ॲड राजिव बिले ,सचिव प्रा .अजित कानशिडे, युवा संघटक युगांत चव्हाण, महिला संघटिका उज्वला येळावीकर व तिचे यजमान आणि  अतुल दळवी यांना घेऊन तीन ते चार समस्या विचारल्या व त्यावर उपायही विचारले . चारही  व्यक्तींसाठी वरील प्रमाणे समस्या व लागणारे साहित्य आणि पाच कोंबडे आणि सामान आणले नाही तर वीस हजार खर्च येणार असल्याचे सांगून मूळा पासून शेंड्यापर्यंत मी सगळा बंदोबस्त करून देईन .
विजय चौकेकर यांनी यावर आपला विश्वास बसत नाही . आपण एखादा चमत्कार अथवा पटेल असे सांगावे . उदा . माझ्या मूलाचे शिक्षण किती आणि आता तो काय काम करतो? आलेल्या व्यक्तिंमधील कोणी एकाला मुले किती व कोणता व्यवसाय करतो ?  एवढेही शक्य नसल्यास आम्ही आता बाहेर ज्या गाडीतून आलोय त्या गाडीचा नंबर तरी अंर्तज्ञानाने ओळखून सांगावा असे सांगतात अंगातली देवी विसावली . नंतर तिला जादूटोणा विरोधी कायदा काय आहे हे समजून देऊन अभाअंनि समितीचे ऐंशी लाखाचे आवाहन स्विकारावे असेही सांगितले . मात्र तिने असे काहीही न करता गयावया  करू लागली . माझ्या अंगात कोणत्याही देवीचा संचार होत नाही . मला भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यातील कोणत्याही घडलेल्या अथवा घडणाऱ्या घटना ओळखता येत नाहीत . माझ्यात कोणताही दैवी संचार होत नाही . लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा माझ्या भल्यासाठी घेत होते . त्यांची आर्थिक फसवणूक करीत होते . माझे वर जादूटोणा विरोधी  कायदयानुसार गुन्हा दाखल न करता एक वेळ मला सुधारण्याची संधी द्यावी .पुन्हा मी अंगात कोणतीही देवी आणून लोकांना फसविणार आणि लुबाडणार नाही तसेच घरोघरी जाऊनही लोकांच्या समस्या सोडविणार नाही असे लेखी लिहून दिले .
यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनेने त्या माफीनाम्यावर सहया करून तिला समजाविले .
                आपल्या समस्यांसाठी अशा कोणत्याही भोंदू बाबांच्या आणि अंगात देवी आणण्याचे सोंग करणाऱ्या व्यक्तीच्या अथवा जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबांच्या नादी लागून  स्वतःची फसवणूक करून घेऊ नये . घडणाऱ्या घटनांमागील कार्यकारण भाव जाणून घेऊन चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आचरावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष ॲड राजीव बिले आणि जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले आहे .

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

जागतिक महिला दिनानिमित्त जाहीर व्याख्यान व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण.

दि.6 मार्च 2026

जागतिक महिला दिनानिमित्त जाहीर व्याख्यान व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

ठाणे : जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे जाहीर व्याख्यान व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, ८ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC) अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ज्योती ढोकणे राहणार असून, प्रमुख व्याख्यान मा. मोनिका काळे यांचे होणार आहे. त्या “बाई, पारख तुझ्या क्षमतेची!” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी मा. वनिता हरमळकर (मुख्याध्यापिका) प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन मा. नीता डुबे (महिला संघटिका, अ.भा. अंनिस, ठाणे) यांनी केले असून, कार्यक्रमात  संगीता सराफ (स्त्रीमुक्ती संघटना)  उपस्थित राहून महिलांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितिच्या ठाणे टीमने केले आहे.

हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, खरेगाव, कळवा (पश्चिम), ठाणे येथे होणार आहे.

महिला सक्षमीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समिती कडून करण्यात येत आहे.
🌞✍️

---

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

पैशांचा पाऊस पाडला आणि जेलमध्ये गेला !


पैशांचा पाऊस किंवा तथाकथीत चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करीत असेल, नागरिकांना फसवत असेल, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करीत असेल, तर हा कायद्याने गुन्हा आहे. नागरिकांनी मांत्रिकाच्या आहारी जाऊ नये आणि जर कोणी असा दावा करीत असेल, तर त्याची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये न घाबरता करावी.

हरिभाऊ पाथोडे, राज्यसंघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
चंद्रपूर : पैशांचा पाऊस पाडतो, तुमच्या घरी चांगले दिवस येतील, असे वेगवेगळे आमिष दाखवून काही जण गंडा-दौऱ्याचा खेळ करतात, परंतु हे सर्व अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. यात दोषी आढळल्यास कारावासाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे अशा आश्वासनाला बळी पडू नये. जिल्ह्यात मागील काही वर्षामध्ये असे अनेक मांत्रिक जेलमध्ये गेले आहे.

जादूटोणा करणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे असले, तरी आजही अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशाच्च बाधा आदीमुळे, तसेच भोंदूबाबाकडून सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक वा आर्थिक नुकसान, तसेच शोषण होण्याच्या घटना अनेक ठिकाणी उघडकीस येतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून याबाबत अनेकदा जनजागृतीही केली जाते. परंतु, काही लोक असे प्रकार करत असल्याचे समोर येत आहे. अशा प्रथांना आळा घालण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येतो. काही प्रकरणांत गुन्हे देखील