अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

सोमवार, ३० जुलै, २०१२

सनातनी विचारांच्या विषाची जाणीवपूर्वक पेरणी


सनातनी विचारांच्या विषाची जाणीवपूर्वक पेरणी

गेल्या शनिवारी 'खेळ मनाचा' प्रसिद्ध झाला. मोबाईल खणखणू लागला. या जादूटोणाविरोधी बिलात तर विरोध करण्यासारखं काही नाही. तरी याला विरोध का? असे प्रश्न मला विचारले जाऊ लागले. पुण्याच्या एका कीर्तनकारांनी (ते तोपर्यंत बिलाला सक्रिय विरोध करत होते. फोनवर माझ्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यांच्याजवळ बिलाची प्रत होतीच. त्यातील प्रत्येक मुद्याबाबत बारीकसारीक शंका काढून पूर्ण शंकानिरसन करून घेतलं. नंतर ते मला म्हणाले, ''मानव, तुम्ही छान समजावून सांगितलं. या बिलात विरोध करण्यासारखं काहीही नाही. उलट ते समाजहिताचं आहे. तुम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांचं शंकानिरसन केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांचा विरोध मावळेल.''

त्यांचा विरोध प्रामाणिक होता म्हणून त्यांचं समाधान झालं. मला खात्री आहे की, थोडीशीही समाजाविषयी कणव असणारा प्रत्येक प्रामाणिक माणूस या बिलाचं समर्थनच करेल. मग विरोध का? सनातन संस्थेच्या गोबेल्स, गणित, खोटय़ा प्रचाराविषयी मी मागच्या लेखात लिहिलं आहेच. त्यांच्या आक्रमक खोटय़ा प्रचाराला अनेक सरळ धर्मप्रेमी माणसं बळी पडतात आणि काही आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी वेड पांघरूण पेडगावला जातात.

आळंदीच्या एका मोठय़ा कीर्तनकारांचे खूप फोन यायचे. मला ते खूप शिव्या घालायचे. आवाजावरनं ते वयस्क कीर्तनकार आहेत हे माझ्या लक्षात आल्यामुळं एरवी कुणाचीही धमकी मुळीच ऐकून न घेणारा मी शांतपणे त्यांचं बांलणं ऐकत असे. शांतपणे त्यांचं शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करत असे. ''तू हिंदूची औलाद नाही. मुसलमानाची औलाद आहे.'' अशी सुरुवात करणारे ते कीर्तनकार नंतर बरेच शांत होत असत. आळंदीला जाऊन मी त्यांच्यासोबतच चर्चा केली. बिलात काय आहे ते समजावून सांगितले. त्याची प्रत त्यांना दिली. त्यांचा एकच आग्रह मुसलमान.. मुसलमान.. मुसलमान. ते जे बोलत होते ते मी लिहिणं शक्य नाही. कुठलाही 'माणूस' त्याचा उच्चारही करू शकत नाही. म्हणून त्यांचे नाव जाहीर लिहीत नाही. शेवटी मी त्यांना म्हणलो, ''मी वारकरी संप्रदायाला खूप मानतो. तीन पिढय़ांपासून माझं घर वारकर्‍यांचं घर आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतपरंपरेचं धर्मातील अंधश्रद्घा दूर करण्याचं मोलाचं काम करण्यासाठीच मी अ. भा. अंनिसची स्थापना केली. गेली 30 वर्षे ते काम करतो आहे. फक्त कीर्तन माध्यमाचा वापर न करता भाषण माध्यमाचा वापर करतो आहे. मी तुम्हांला, वारकर्‍यांना बापासारखा समजतो. आपला समजतो. म्हणून माझ्यावतीनं मी खूप तळमळीनं तुम्हांला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जोवर या देशात मुसलमान आहेत तोवर एकही समस्या सुटू शकत नाही. तोवर कोणताही बदल, सुधारणा करता कामा नये असंच तुमचं मत असेल तर आधी या देशातील 22 कोटी मुसलमान मारून टाका. मगच आपण धर्मसुधारणा - अंधश्रद्घा निर्मूलन या विषयासंबंधी बोलू..''

माणसाला सहिष्णुता शिकवणार्‍या वारकरी संप्रदायाचा एखादा समुदाय एवढय़ा विषारी विचारांचा असू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. पण हे सनातनी विचारांचं विष पेरण्याचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि त्यांच्या हाती 'ब्रेन वॉशिंग'सारखं प्रभावी, आधुनिक हत्यार आलं आहे. यासंबंधी नंतर विस्तारानं लिहीनच. पण या बिलासंबंधी मुद्दाम गैरसमज पसरविण्याचं राजकीय कौशल्य कुणाचं? मला पहिल्यांदाच जाहीररीत्या सांगून टाकलं पाहिजे, की भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा 'युवा स्तंभ' चालवत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करून टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी भाजपतर्फे अशोक मोडक या आमदारांना प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात मा.गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंगजी फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल, असं एक मतानं सांगितलं.

मा. अशोक मोडक अतिशय आग्रही. पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळं आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळींना महत्त्वाचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळं या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात, ''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द, त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्याची जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2005 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितली. सुरुवातीस आ. लोढा माझ्याशी बोलण्यास तयारच होईना. सनातन्यांनी त्यांना एवढं भडकवलं होतं, की ते मला बहुधा राक्षस (मानव नाहीच) समजत असावेत. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले, ''मानव, हे तर फारच चांगलं बिल झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्ही धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठीच या बिलात काही तरी टाका. चांगल्या धार्मिक रूढी-परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी..'' मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. 'या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या कोणत्याही चांगल्या रूढी-परंपरेचा समावेश नाही' अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्यांचं 13 वं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळे आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळं आम्ही गप्प बसलो.

2005 साली 26 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत, बहुमतानं हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं. त्यावर काही भाषणं झाली. त्यात आ. देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. आणीबाणी काळातील व

माझ्या नागपूर वास्तव्यातील आमचे एक जिंदादिल स्नेही गंगाधर फडणवीस यांचा तडफदार

मुलगा म्हणून देवेंद्र फडणवीस हा आम्हा सगळ्यांचा कौतुकाचा व औत्सुक्याचा विषय. पुढच्या

मुंबई अधिवेशनात त्यांनी या 13व्या कलमाकडे माझं लक्ष वेधून घेतलं. ते वकीलही आहेत. मी ते 13 वं कलम खूप गांभीर्यानं घेतलं.

काय आहे 'ते' कलम?

13. शंका दूर करण्यासाठी याद्वारे उसे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.

याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमात एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल (कारण या 12व्या कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही असं व्याख्येत 2 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणार नाही.

चांगल्या रूढी-परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे 13 वं कलम समाविष्ट केलं आहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्याकडे गेलो. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे 13वं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. ''भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवतात. मग क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात ते योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा.'' एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत, तर अनेक तास माझ्यासोबत बसून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली.

पण पुढे म्हणाले, ''पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या रूढी-परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्‍या धार्मिक, विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो.'' सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना.चंद्रकांत हांडोरेही रिलॅक्स झाले. पण मग ''उद्या आम्ही, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल, शारीरिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करत असलो तर म्हणालं तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल.'' असं कोण म्हणालं? का म्हणालं? वृत्तपत्रात मोठमोठे मथळे बातम्या छापून आल्यानं. असं बिलात कुठेही नसतानाही सनातन्यांच्या खांद्याला खांदा लावून या बिलाच्या विरुद्ध असा गोबेल्सप्रणीत खोटा प्रचार करण्याची सुपारी कुणी घेतली आहे? का घेतली असावी? पाहू पुढच्या शनिवारी.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

प्रबोधनकारांचे विचार रावते विसरलेत का?



हे जादूटोणाविरोधी बिल.. आमच्या हिंदू धर्माविरुद्ध आहे. उद्या आम्ही आमच्या घरी भक्तिभावानं, श्रद्धेपोटी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल तुमचं आर्थिक नुकसान झालं आणि आम्हाला सहा महिने जेलमध्ये पाठवाल. आमचे वारकरी श्रद्धेनं पंढरपूरला पायी जातात. तुम्ही म्हणाल तुमचं शारीरिक नुकसान झालं आणि वारकर्‍यांना जेलमध्ये पाठवाल. सहा महिने ते सात वर्षे. आम्ही भक्तिभावानं दोन तास पूजा केली तर तुम्ही म्हणाल आमचं मानसिक नुकसान झालं आणि तुम्ही आम्हाला जेलमध्ये पाठवाल..!''

एवढय़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार गुरुनाथ कुळकर्णी (ते वकीलही होते) उभे राहिलेत. म्हणू लागले, ''अहो रावते, असं या जादूटोणा बिलात काहीही नाही. कुठे आहे ते दाखवा. तुम्ही कुणाच्या आधारावर हे बोलता?''

''तुम्ही गप्प बसा! मला थांबवू शकत नाही. बिलावर आमदाराला बोलता येतं. कितीही बोलता येतं. हा माझा अधिकार आहे. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला. माझं म्हणणं खोडा, पण आता मी बोलणारचं.. असं म्हणत आ. दिवाकर रावते बोलत राहिले. आ. गुरुनाथ कुळकर्णी आणि इतरांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आ. दिवाकर रावते बोलत राहिले, हे बिल हिंदू धर्मविरोधी आहे असं सांगत राहिले. त्या दिवशी विधानपरिषदेतील त्यांचं हे भाषण अपूर्ण राहिलं. 2006 सालची ही गोष्ट. मुंबईचं अधिवेशन संपलं. अजूनही विधानपरिषदेत आ. दिवाकर रावते हे ऑनलेग आहेत. म्हणजे बिलावर पुन्हा दुसर्‍या अधिवेशनात चर्चा सुरू झाली तर आ. दिवाकर रावतेंच्या बोलण्यापासून त्याची सुरुवात होणार! आ. रावतेंच्या भाषणांच्या बातम्या मोठय़ा प्रमाणावर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या.'जादूटोणाविरोधी बिल' हा खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळं महाराष्ट्रभर बातम्या वृत्तपत्र माध्यमातून पसरल्या. पण असं बिलात काहीही नाही. हे मुद्दाम चुकीचं मत मांडलं आहे असं मात्र कुणाही वर्तमानपत्रानं सोबत लिहिलं नाही. याविरुद्ध मत मांडणारं दुसर्‍या कुणाचं भाषणच झालं नसल्यामुळं वृत्तपत्रातून तशी बातमी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही.सनातन्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवून दाखवून वारकर्‍यांना, धार्मिक लोकांना भडकवलं. हे खोटंनाटं सांगून लोकांना भडकवणं आजही सुरू आहे. सनातन्यांचं मी समजू शकतो. कारण गोबेल्सप्रणीत अफवा पसरविण्याच्या यंत्रणेमध्ये ते तरबेज आहेत. त्यांच्या गुरूंनी त्यांना त्या पद्धतीनं 'ब्रेनवॉश' करूनच जनतेत सोडलं आहे. याची महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याला व त्यातील 'एटीएस'(अँन्टी टेररिस्ट स्कॉड) ला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं सनातन संस्था आणि तिचे मुखवटे असणार्‍या संघटनांवर बंदी आणण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. पण या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा प्रखर डोस पाजणार्‍या प्रबोधनकार ( म्हणूनच त्यांना 'प्रबोधनकार' ही पदवी लोकांनी बहाल केली.) ठाकरेंचा वारसा असणार्‍या शिवसेनेच्या (मा. बाळासाहेब ठाकरेंचे ते वडील आहेत) आ. रावतेंनी असा खोटा, चुकीचा, समाजविघातक प्रचार का केला?आ. दिवाकर रावते हे उत्तम संसदपटू आहेत. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून विधानपरिषदेत अत्यंत लढाऊ पद्धतीनं, लोकांचे प्रश्न जिव्हाळय़ानं लावून धरताना, लोकांसाठी लढताना मी आणि महाराष्ट्रानं पाहिलं आहे.म्हणूनच जेव्हा सामाजिक न्यायमंर्त्यांनी विरोधी पक्षाच्या सहमतीनं हे बिल आणूया, त्यांच्याही सूचनांचा विचार करूया, असं ठरवलं. माझ्यावर काही जबाबदारी सोपवली. तेव्हा 2005 साली सगळय़ात पहिले मी आ. दिवाकर रावते यांना भेटलो. त्यांच्यासोबत छान चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलन याविषयासंबंधी बोलताना ते म्हणाले, ''अहो मानव, तुम्ही आता हे काम करता आहात, पण मी आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंसोबत या परिवर्तनाच्या लढाईत सामील आहे. शिवसेनेच्या जन्माआधीपासून माझ्यावर हा संस्कार (प्रबोधनकार ठाकरेंचा) झाला आहे. आमच्यासाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन' काही नवं नाही.'' त्यानंतर विस्तारानं त्यांच्यासोबत चर्चा झाली. मूळ बिलात बदलासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अतिशय अनुकूल प्रतिसाद दिला. त्यानंतर आ. सुभाष देसाईंशी चर्चा केली. त्यांनीही पहिल्या भेटीत अत्यंत मोलाच्या सूचना केल्या. एवढंच नव्हे, तर. डिसेंबर 2005 मधील अधिवेशनात हे बिल मांडण्याचं ठरलं. कॅबिनेटची सही झाली. बिल छपाईला जाण्याआधी मी आ. सुभाष देसाईंना दाखवलं. त्यांनी सुचवलं.''मानव,'दैवीशक्ती','देवी', 'देव' असे शब्द बिलात ठेवू नका. त्याऐवजी 'अतिंद्रिय शक्ती', 'अतिमानुष शक्ती' असे शब्द वापरा.'' केवळ सुचवलंच नाही तर माझ्यासोबत बसून ते शब्द जिथे-जिथे आहेत तिथे-तिथे आम्ही एकूण दहा बदल केले. त्यानंतर तडक मी कायदा विभागाचे सचिव श्री. शिंदेकरांकडे गेलो. त्यांना आ. सुभाष देसाईंनी सुचवलेले बदल सांगितले. त्यामुळं बिलात फरक पडत नाही. हे त्यांना पटल्यावर त्यांनी हे बिल रात्री 10 वाजता छपाईला पाठवलं. मुख्यमंर्त्यांशी फोनवर ते बोलले. आ. देसाईंनी सुचविलेल्या बदलासंबंधी सांगितलं. मुख्यमंर्त्यांनी संमती दिली. ना. हांडोरेंना सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली. कॅबिनेटची सही झाल्यावरसुद्धा 10 ठिकाणी बदल करण्यात आले. पंधरा दिवस आधी मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्या वतीनं बिलासंबंधी बोलण्यास मी मातोश्रीवर गेलो होतो. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर वेगळंच वातावरण होतं. राज ठाकरे नाराज होऊन बाहेर पडणार अशी बातमी होती. बाळासाहेब ठाकरे फार वेगळ्या मूडमध्ये होते. शिवसेना नेत्यांची, आमदार, खासदारांची सारी धावपळ सुरू होती. त्यामुळं बाळासाहेब भेटू शकले नाहीत; पण त्याही वातावरणात उद्धव ठाकरे अर्धातास बोलले. '' हे काम आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं आहे, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. बिलाच्या मथळ्यात 'अंधविश्वास' हा शब्द होता. ते पाहून ते म्हणाले, 'अंधविश्वास' हा शब्द कशाला ठेवता? मग श्रद्धा, अंधश्रद्धा ही भानगड येते. त्यापेक्षा 'अघोरी प्रथा' हा शब्द वापरा. उद्धव ठाकरेंशी त्या दिवशी नीट बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर सोमवारी भेटायचं ठरलं, पण सोमवारी उद्धवजींचा फोन बंद होता. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला होता. शिवसेनेमधलं कुणीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतं आणि मला नागपूर अधिवेशनात पोहोचायचं असल्यानं थांबणं शक्य नव्हतं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना उद्धव ठाकरेंची सूचना सांगितली. मुख्यमंर्त्यांनी आनंदानं संमती दिली. ''ठीक आहे, बिलाच्या मथळ्यातून 'अंधविश्वास' शब्द काढून टाका. त्याऐवजी 'अघोरी प्रथा' शब्द टाका.'' आणि मग बिलाचं नाव झालं, 'महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन.' हा सारा इतिहास मी का सांगतो आहे? कारण सगळ्यांच्या सहमतीनं हे बिल संमत व्हावं असा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारनं हे बिल आणलं. भाजप पक्षानं 100 टक्के संमती दिली. शिवसेनेनं 100 टक्के संमती देण्याआधीच हे बिल सभागृहात मांडून 16 डिसेंबर 2005 साली विधानसभेत संमत झालं. पण तोवर शिवसेनेनं सुचविलेल्या अनेक सूचना या बिलात अंतर्भूत झाल्या आहेत. असं असताना आ. दिवाकर रावतेंनी या बिलाच्या विरोधात सनातन्यांची सुपारी का घेतली? ते सनातन्यांची भाषा का बोलतात? प्रबोधनकार ठाकरेंची भाषा ते विसरले आहेत काय? ते जे आज या बिलासंबंधी खोटंनाटं (होय, जाणीवपूर्वक हा शब्द मी वापरतो आहे) बोलताहेत ते पाहून प्रबोधनकार ठाकरेंच्या आत्म्याला (प्रा. रावते मानतात म्हणून) वेदना होत नसतील का? मला माहीत आहे, आ. दिवाकर रावतेंना बिल चांगलं कळतं. हा त्यांचा गैरसमज नाही. ते मुद्दाम खोटं बोलून बिलासंबंधी अपप्रचार करताहेत. त्यांनी खरं बोलून या बिलाला विरोध करावा, असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांनी म्हणावं, परिशिष्टातील 12 कलमांना माझा विरोध आहे. भूत काढण्याच्या नावाखाली छळ होऊन माणसं मेली तरी चालतील, चमत्कारी बाबांनी लोकांना ठगवलं तरी चालेल, जादूटोण्याच्या संशयापायी छळ होऊन माणसं मेली तरी चालतील..वगैरे वगैरे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुबुद्ध जनतेला माझं जाहीर आवाहन आहे की, या बिलाला विरोध करणार्‍या सगळ्यांनाच आपण जाहीर धारेवर धरा. आडवेतिडवे प्रश्न विचारा, जाब विचारा, तुमच्याजवळ या बिलाची प्रत नसेल तर ती मी ु.रलरपी.ेीस.ळप(ही अ.भा.अंनिसची साईट आहे) या साईटवर टाकली आहे. तिथून प्रिंट करून ही प्रत मिळवा आणि सनातन्यांचं कारस्थान उधळून लावा. त्यांना या देशात पुन्हा चातुर्वर्ण आणायचा आहे. पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही उतरंड निर्माण करायची आहे. सार्‍या प्रकारच्या अंधश्रद्धा पुन्हा समाजात रुजवायच्या आहेत. पुन्हा मनुस्मृतीचे कायदे या समाजावर लादायचे आहेत. अस्पृश्यतेचं समर्थन करणारीही मंडळी आहे हे लक्षात ठेवा. खोटं वाटत असेल तर 'सनातन प्रभात' वाचा, वर्षभराचे अंक चाळा. म्हणजे याचं खरं स्वरूप तुम्हाला दिसेल. म्हणूनच वारकर्‍यांचं आवरण ओढलेले छुपे सनातनी म्हणतात, ''आम्ही आधी हिंदू आहोत, नंतर वारकरी आहोत. मनुस्मृती चांगली आहे. म. फुले-सावित्रीबाई

फुले यांनी काहीच केलं नाही. या देशात स्त्रियांना स्वातंर्त्य, शिक्षण होतंच. सगळं वाईट

मुसलमानांमुळं झालं आहे. आधुनिक भारतातल्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण हे चालू द्यायचं का? आजच्या पिढीनं हे ठरवायचं आहे. जादूटोणाविरोधी बिल हे केवळ निमित्त.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत.)

गुरुवार, १९ जुलै, २०१२

सनातन'च्या मुखवटय़ांचाच जादूटोणा विधेयकाला विरोध


अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती
श्याम मानव यांचा पुण्यनगरी तील लेख (१४/७/१२)

सनातन'च्या मुखवटय़ांचाच जादूटोणा विधेयकाला विरोध

जादूटोणाविरोधी विधेयकासंबंधी पुन्हा गदारोळ सुरू झाला. काही हिंदुत्ववादी संघटनांचे या विधेयकाविरुद्ध निषेध, मोर्चे सुरू झाले. या विधेयकामुळे ''आमच्या धर्मावर गदा येणार, वारीला जाणं, सत्यनारायण करणं, पूजा करणं गुन्हा ठरणार! हे विधेयक केवळ हिंदूंच्या विरुद्ध आहे,'' असाही आरडाओरडा सुरू झाला आहे.

खरंच या विधेयकात असं काही आहे का? हे विधेयक महाराष्ट्र सरकारचं विधेयक आहे. कोणतं तरी सरकार या पद्धतीचं, चांगल्या धार्मिक आचार-प्रथांना, पंढरपूर वारीसारख्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणणार्याी, पुरोगामी महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्याप, 700 वर्षाच्या परंपरेला विरोध करणारं विधेयक आणण्याचं धाडस करील का?

मग हा विरोध का? गैरसमजावर आधारलेला आहे की वेड पांघरूण पेडगावला जाण्याचा हा प्रकार आहे?

विरोध करणार्यां ह्या सगळ्यांचं नेतृत्व 'सनातन संस्था' करते. हिंदू जनजागरण समिती ते वारकरी संघटना हे याच सनातनचे मुखवटे आहेत. सनातन संस्था, हिंदू जनजागरण समितीतील काही कार्यकर्ते महाराष्ट्र, गोव्यात बॉम्बस्फोटासारख्या कृत्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या लोकांनी जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, आवश्यकच आहे. कारण त्यांना या महाराष्ट्रात, देशात पुन्हा सनातन धर्म रुजवायचा आहे. चातुर्वण्र्य पुन्हा प्रस्थापित करायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची नवी धर्मनिरपेक्ष तोंडवळ्याची राज्यघटना निर्माण करून पुरोगामी भारताची मुहूर्तमेढ रोवली. ही सगळी आधुनिकतेकडे, पुरोगामित्वाकडे वाटचाल करणारी चक्र उलटी फिरवून सनातन भारत निर्माण करणं हा त्यांचा उद्देश आहे.

मीही जन्मानं हिंदू आहे. अजूनतरी धर्म न सोडल्याने वा न बदलल्याने हिंदूच आहे. त्यामुळं मी प्रत्येक हिंदू आणि इतरही धर्मातील सगळ्या धर्मप्रेमी माणसांना विनंती करतो की, त्यांनी या सनातन संस्थेतर्फे प्रकाशित होणारं 'सनातन प्रभात' दैनिक, साप्ताहिक वाचावं. किमान वर्षभराचे अंक चाळावेत म्हणजे याचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येईल. यांचा भुताखेतांपासून, मंत्रतंत्रादी सगळ्याच अंधश्रद्धांवर विश्वास आहे. नव्हे, ते या सगळ्या प्रकारांचा प्रसार-प्रचार करतात; पण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं या गोष्टी सिद्ध करण्याचं 15 लाख रुपयांचं आव्हान आहे. ते मात्र स्वीकारून भूत, मंत्रतंत्र सिद्ध करण्याचं धाडस दाखवीत नाहीत.

महाराष्ट्र सरकारनं खरंतर आपल्या गुप्तचर यंत्रणेकडून सगळी माहिती गोळा केली तर यांच्या विरोधामागचं कारणंही सरकारला कळून येईल आणि मग त्यांच्या विरोधाला भीक घालण्याची गरज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना वाटणार नाही. हे खरं आहे की, जादूटोणाविरोधी विधेयक संमत झालं तर सगळ्यात मोठा आघात 'सनातन संस्था-सनातन प्रभात' यांच्यावर होणार आहे. कायदा लागू झाल्यापासून त्यांना एकतर आमूलाग्र बदलावं लागणार आहे अथवा सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जीव तोडून या विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे.

पण इतरांनी का विरोध करावा? काय आहे या बिलात?

त्या वेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सध्याचे जादूटोणाविरोधी विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे.

16 डिसेंबर 2005 साली ते विधानसभेत, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाले होते. पुढे ते अडकले.

आता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा ते विधानसभेत मांडले आहे. फक्त विधेयकाच्या नावात बदल केला. बाकी विधेयक जसेच्या तसे आहे.

सध्याच्या विधेयकातील शब्दन्शब्द विचारपूर्वक ठरविण्याची संधी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्यासोबत मला मिळाली. ना. हांडोरे, त्यांचे खाजगी सचिव मिलिंद शंभरकर आणि मी अशा तिघांनी या विधेयकाचे अंतिम प्रारूप ठरविण्यात प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळं या विधेयकात आलेल्या प्रत्येक शब्दामागचा, बदलामागचा इतिहास मला ठाऊक आहे. तो वाचकांसोबत शेअर करण्याची संधी मी घेतो आहे.

अनेकांना वाटतं हे विधेयक फार कमजोर आहे. असं वाटणं चांगली गोष्ट आहे; पण गेल्या 30 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ लढाऊपणे तळागाळातून चालविणार्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे की, हा कायदा अतिशय ताकदवान आहे. सरकारच्या कर्तव्याच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या सध्याच्या मर्यादेत राहून यापेक्षा प्रभावी विधेयक तयार करणं शक्य नाही.

पण हा कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे. आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळवाल्यांचा नाही. तसा तो असता तर फलज्योतिषापासून तर परामानसशास्त्रीय दावे करणार्यां्पर्यंत सारे या विधेयकात ओढले गेले असते, पण ते शक्य नव्हतं.

कारण अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे प्रबोधनाचं काम आहे. हे प्रबोधन आमच्या सारख्या कार्यकत्र्यांनी, प्रसिद्धिमाध्यमांनी व सरकारनेही केलं पाहिजे, पण राज्य सरकारनं जिथे माणसांची उघड फसवणूक होते, लुबाडणूक होते, जीव धोक्यात येतो तिथेच कायद्याद्वारा हस्तक्षेप केला पाहिजे. याचं नीट भान ठेवून सध्याचं प्रारूप तयार झालं आहे.

सध्याच्या विधेयकाचा मथळा आहे,''महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2011''. अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, नरबळी याचा अर्थ काय?

2. ख.नुसार याची व्याख्या सोपी करून टाकली. परिशिष्टात जोडलेली 12 कलमं म्हणजेच ''अमानवीय, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळी.'' या बाहेरची एकही गोष्ट या विधेयकात अंतर्भूत नाही.

अशी अपवादात्मक व सोपी सुटसुटीत व्याख्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यामुळं करण्यात आली. त्यांनी खूप मेहनतीनं हे विधेयक सोपं, सुटसुटीत करण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं.

सर्वसाधारण विधेयकात शब्दांची व्याख्या करावी लागते. त्यात खूप गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून काही लोक अमानवीय, अघोरी, अनिष्ट प्रथा यात अनेक प्रथांवर बंदी येईल, अशी भीती व्यक्त करतात, पण केवळ व्याख्येद्वारा 12 कलमांच्या मर्यादेतच हे विधेयक बंदिस्त केले आहे. त्यात इतर प्रथा येत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा.

परिशिष्टातील 12 कलमासंबंधी कृती घडली की संबंधितांसाठी शिक्षा मात्र कठोर आहे. सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड. शिवाय या अपराधाचा प्रसार-प्रचार करणार्याेसही एवढीच कठोर शिक्षा आहे.

शिवाय हा अपराध दखलपात्र व अजामीनपात्र आहे. त्यामुळं पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागेल व जामीन न्यायालयातून घ्यावा लागेल.

पण अपराध काय? परिशिष्टातील ही 12 कलमे वाचा

1. भूत उतरविण्याच्या बहाण्याने, बांधून ठेवून वा अन्यरीत्या मारहाण करणे, मिरचीची धुरी देणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पाजणे, छताला टांगणे, तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, जबरदस्तीने मूत्र, विष्ठा पाजणे, केस उपटणे.

(भूत उतरविण्यासाठी मंत्र-प्रार्थना, पूजा करणे गुन्हा नाही.)

2. एखाद्या व्यक्तीने (जिवंत) तथाकथित चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करणे, फसविणे, ठकविणे, दहशत बसविणे.

3. जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे, उत्तेजन देणे, सक्ती करणे.

4. कोणतेही अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, सल्ला देणे, प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे.

5. अतिंद्रिय शक्ती संचारली असे भासवून भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देणे.

(केवळ देव-देवी अंगात येणे गुन्हा नाही.)

6. एखादी व्यक्ती करणी करते, काळी विद्या करते, भूत लावते, जनावरांचे दूध आठविते, अपशकुनी आहे, रोगराई पसरविते, सैतान आहे असे जाहीर करणे व त्या व्यक्तीचे जगणे त्रासदायक करणे.

7. करणी, चेटूक केले या सबबीखाली मारहाण करणे, धिंड काढणे, वाळीत टाकणे.

8. भुतांची भीती घालणे, शारीरिक इजा भुतामुळे झाली सांगणे, वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र-अघोरी उपाय करणे, मृत्यूची भीती घालणे.

9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे सारखे उपचार करणे.

(कुर्त्यावर अँन्टीरेबीज, अँन्टीव्हेनम (स्नेक) इंजेक्शन्स वेळीच घेतल्यास माणसं वाचू शकतात. कोकणातल्या विंचूदंशानं माणूस मरू शकतो, पण वैद्यकीय उपचारांनी वाचू शकतो.)

10. बोटाने शस्त्रक्रिया करतो वा गर्भवती स्त्रीचे गर्भलिंग बदलवितो असा दावा करणे.

11. अवतार असल्याचे सांगून व पूर्वजन्मी प्रियकर, प्रेयसी, पती, पत्नी असल्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवणे.

12. मंदबुद्धीच्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे असे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय करणे.

आता या बारा कलमात विरोध करण्यासाठी काय आहे? कुणीतरी सुबुद्ध माणूस याला विरोध करणं शक्य आहे का?

ही 12 कलमं म्हणजेच कायदा आहे. मग हे सत्यनारायण, वारी, पूजेला कायदा विरोध करतो हे कुठून आलं? त्याला आधार काय?

(क्रमश:)

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

सोमवार, १८ जून, २०१२

व्याखाना - आधुनिक संत गाडगेबाबा

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती आयोजित विशेष कार्यक्रम. 

"आधुनिक संत गाडगेबाबा" 



वक्ते - दिलीप जोशी, 
अध्यक्ष, खगोल मंडळ व पत्रकार 


स्थळ- सोशल सर्विस लीग शाळा,
दामोदर हॉल जवळ, परळ पूर्व,मुंबई, ४०००१२


दिनांक व वेळ- शनिवार ७ जुलै २०१२,
सायं. ६.०० वाजता. 

शनिवार, २ जून, २०१२

देवाला कौल कसे लावले जाते .

"वाचन आणि लेखन कसे करावे ? "विशेष कार्यक्रम

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती 
आजोजित विशेष कार्यक्रम. 

"वाचन आणि लेखन कसे करावे ?"मार्गदर्शक- सचिन परब (संपादक- नव शक्ती) 

स्थळ- सोशल सर्विस लीग शाळा, 
दामोदर हॉल जवळ, परळ पूर्व, 
मुंबई, ४०००१२

दिनांक व वेळ- २ जून २०१२, सायं. ६.०० वाजता. 

प्रवेश- विनामूल्य

सोमवार, ७ मे, २०१२

अ.भा.अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या या वेब साईटला अवष्य भेट द्या

http://www.abans.org.in/ 
अ.भा.अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या या  वेब साईटला  अवष्य भेट द्या 


http://www.abans.org.in/